म्हणे सरकार तर नालायकच आहे!
पण, आपल्या पैकी किती जण प्रत्यक्ष राजकारणात किंवा समाजकारणात उतरून परिस्थिती बदलणार आहोत? हा कळीचा प्रश्न आहे. निव्वळ चर्चेवर चर्चा. दर रोज येन केन प्रकारे फक्त सरकारला शिव्या घालून काय सध्या होणार आहे? आपण राजकारण करत नाही तर ते करत आहेत. मग, जर आपल्यालाला राजकारणात उतरायचे नसेल तर आपण नुसते बोलून काही व्हायचे नाही.
अण्णा हजारे यांनी आंदोलन छेडल्यावर मेणबत्ती मोर्चा मध्ये हजारो जण सामील कारण, त्यात 'स्टेटस' आहे. फेसबुक 'इवेंट' मध्ये ४०००० वर उपस्थिती. पण, अण्णांनी 'जेल भरो' ची हाक दिली आणि सर्व चिडी चूप. 'इवेंट' मध्ये इन मीन ५० लोकांची पसंती!!! तेव्हा देश प्रेम एकाएकी विरून जाते. सर्व कामात 'बिझी' झाले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी, महात्मा गांधीजींनी अशी भाषणबाजी केली नाही. त्यांनी कृती केली. नाहीतर हिंदुस्तानी जनता आजही जुलमी पारतंत्र्यात खितपत पडली असती. ते स्वतःच्या कर्तुत्वाने इतरांना पण प्रेरणा देते झाले आणि शून्यातून विश्व निर्माण केले. म्हणूनच, ते युग पुरुष ठरलेत. निव्वळ, चार ओळीत सरकारला शिव्या घालायच्या, स्वतः कृतीने काही करायचे नाही. फेसबुकवर मिळालेल्या १०-२० 'लाईक' की धन्यता मानायची. याने काही घडणार नाही! जर, खरच बदल घडवायचा असेल तर तो स्वतः पासून सुरु करावा लागेल. कृतीने करावा लागेल. नाहीतर काळाच्या ओघात हि फक्त कावळ्यांची वरात किंवा कोल्हेकुई ठरेल. सिंह प्रमाणे कोणी डरकाळी फोडायला तयार आहे का? हा प्रश्न अनुत्तरीत आहे. आणि तो सोडवणे आपल्या प्रत्येकाच्या हातात आहे.
- मयूर देशमुख (परभणी, महाराष्ट्र)
